Wednesday 15 May 2013

पाणीसाठय़ात होणार वाढ

पाणीसाठय़ात होणार वाढ!
महात्मा फुले जलभूमी अभियानामुळे खानापूर तालुक्यात जलसंजीवनी
दैनिक लोकमत, (हेल्लो सांगली, पुरवणी) तारीख १५ मे २०१३
खानापूर तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर महात्मा फुले जलभूमी अभियान सुरू आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली असून तालुक्यातील १७ गावात ८१ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणी साठय़ात ४१८.२१ टीसीएम वाढ होणार असून त्यासाठी सुमारे ३0 लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
- राजेंद्र माने
तालुका कृषी अधिकारी, विटा दिलीप मोहिते। दि. १५ (विटा)
भीषण दुष्काळी परिस्थितीत तालुका कृषी विभागाने हाती घेतलेल्या महात्मा जोतिबा फुले जलभूमी अभियानामुळे दुष्काळी खानापूर तालुक्यातील १७ गावांना जलसंजीवनी मिळणार आहे. या अभियानांतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या ८१ कामांमुळे तालुक्यात सुमारे ४१८.२१ टीसीएम (दशलक्ष घनमीटर) पाणी साठय़ात वाढ होणार असल्याचा दावा तालुका कृषी विभागाने केला आहे.
खानापूर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी अडविण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर खानापूर तालुक्यात तालुका कृषी विभागाच्यावतीने राज्य शासनाने महात्मा फुले जलभूमी अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानामुळे तालुक्यात जलसंधारणाच्या कामांनी गती घेतली आहे.
महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत तालुक्यात जुन्या व नवीन सिमेंट नालबंडींगमधील गाळ काढणे, खोलीकरण व सरळीकरणाची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १७ गावात ८१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
विटा येथे ९ कामांद्वारे २२ हजार ९७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी पाणीसाठय़ात २२.0९ टीसीएम वाढहोणार आहे. ढवळेश्‍वरात ३ कामांद्वारे २८ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्याठिकाणी २८ टीसीएम पाणीसाठा अपेक्षित आहे. चिंचणी (मं.) हद्दीत ४ हजार ८00 घनमीटर गाळ काढला असून तेथे ४.८0 टीसीएम पाणीसाठा होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.तालुक्यात सर्वाधिक गार्डी गावात महात्मा फुले जलभूमी अभियानाचे काम उत्कृष्ट झाले आहे. येथे ६५ हजार १५७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहेच, शिवाय करंज ओढय़ाचे सरळीकरण करण्यात आल्याने पाणी साठय़ात सुमारे ६५.१६ टीसीएम वाढ होणार आहे. माधळमुठी गावात ११ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ६५ हजार ७२ घनमीटर गाळ काढल्याने ६५.0७ टीसीएम पाणीसाठा होत आहे. वासुंबे येथे ४ कामे पूर्ण झाली असून २२ हजार ४४४ घनमीटर गाळ काढण्यात आल्याने २२.४४ टीसीएम पाणीसाठा होणार आहे.
भूड येथे ७ कामांद्वारे २५ हजार ७१४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्या ठिकाणी २५.७१ टीसीएम पाणीसाठय़ात वाढ अपेक्षित आहे. जोंधळखिंडीत २५ हजार ६७0 घनमीटर गाळ काढण्यात आला असून तेथील पाणी साठय़ात २५.६७ टीसीएम वाढ होणार आहे. भांबर्डेत २७.९७, देवनगरला २५.१३, सांगोले येथे १२.५२, घानवडला ६.५३, हिंगणगादे येथे ३८.0६, भेंडवडे येथे ११.४६, नागेवाडीत १0.४३, वेजेगावात १३.५0, तर साळशिंगे येथे पाणी साठय़ात १३.६५ टीसीएम वाढ होण्याचे संकेत आहेत.
खानापूर तालुक्यात ८१ कामांद्वारे सुमारे ४ लाख १८ हजार २१४ घनमीटर गाळ काढल्यामुळे पाणी साठय़ात ४१८.२१ टीसीएम वाढ होणार आहे. ■ साळशिंगे (ता. खानापूर) येथे जलभूमी अभियानांतर्गत बंधार्‍यातील गाळ काढण्यात आला. खानापूर तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर महात्मा फुले जलभूमी अभियान सुरू आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली असून तालुक्यातील १७ गावात ८१ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणी साठय़ात ४१८.२१ टीसीएम वाढ होणार असून त्यासाठी सुमारे ३0 लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
- राजेंद्र माने
तालुका कृषी अधिकारी, विटा

No comments:

Post a Comment